yuva MAharashtra सांगली-हरिपूर रस्त्याचे काम रखडलेलेच, जबाबदार कोण? त्रस्त नागरिक आंदोलन करणार !

सांगली-हरिपूर रस्त्याचे काम रखडलेलेच, जबाबदार कोण? त्रस्त नागरिक आंदोलन करणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२५

सांगली-हरिपूर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, या रखडलेल्या प्रकल्पामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अवघ्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी तब्बल १२ कोटींची निविदा खासगी कंपनीला मिळाली होती. पण, काम सुरू होण्यास सहा महिने उशीर झाला आणि त्यानंतरही काम कासवगतीनेच सुरू आहे.

या डांबरी रस्त्याचे काँक्रिटमध्ये रूपांतर का करायचे ठरवले, याचे कारणही स्पष्ट नाही. ३ जून २०२२ रोजी या कामाचे उद्घाटन झाले होते, पण प्रत्यक्ष कामाला सुरूवात चार महिन्यांनंतर झाली. एवढ्या छोट्या अंतराचा रस्ता तीन वर्षांनंतरही पूर्ण न होणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे.

या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या हरिपूर गावकऱ्यांनी खड्ड्यांमध्ये बसून रस्त्याच्या 'वाढदिवसाचा' अनोखा निषेध नोंदवला. मात्र तरीही प्रशासनाचे डोळे उघडताना दिसत नाहीत. कामाची पहिली मुदत एका वर्षाची होती, त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत १९ मार्च २०२५ रोजी संपली, तरी रस्ता अजूनही अपूर्ण आहे.

अधिकार्‍यांनी विलंबाचे कारण म्हणून मागील वर्षी आलेल्या महापूराचा हवाला दिला आहे. मात्र, आता जुलैमध्ये श्रावण सुरू होणार आहे आणि संगमेश्वर देवाच्या यात्रेसाठी हजारो भाविक या मार्गावरून ये-जा करतात. मागील वर्षी यात्रेच्या वेळी भाविक व व्यावसायिकांचे हाल झाले. यंदा तरी ही स्थिती बदलणार का, हाच प्रश्न आहे.


सध्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. पावसामुळे खोदलेल्या भागात पाणी साचले असून, रस्त्यावरून रात्री प्रवास करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे आहे. पथदिव्यांचा अभाव, बाजूला खड्डे, पाण्याचे तळे आणि चिखलमय मार्ग यामुळे प्रवाशांचा संयम सुटत आहे.

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

हरिपूरचे ग्रामस्थ म्हणतात की, जर लवकरात लवकर दर्जेदार रस्ता झाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाईल.

> पंकज आळवेकर, उद्योजक, हरिपूर
“या रस्त्यावरून प्रवास म्हणजे जीवघेणी कसरत आहे. लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास चिखलात बसून आंदोलन करणार आहोत.”

> शिवाजी मोहिते, काँग्रेस नेते, हरिपूर
“माहिती अधिकारातून मागवलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नाहीत. रस्त्यावर गटार नाहीत, पाण्याचा निचरा होत नाही – अनेक कमतरता आहेत.”