| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ मे २०२५
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारताने जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा खात्मा केला असून, यात त्याच्या बहिणीपासून ते पुतण्यांपर्यंत अनेक जणांचा समावेश आहे.
या कारवाईत मसूद अझहरचा भाऊ आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. त्याचा मुलगा हुजैफाही हल्ल्यात ठार झाला असून, अझहरच्या इतर नातेवाईकांमध्ये रौफ असगरचा भाऊ रीफ असगर याच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. एकूण पाच जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या गडांवर जबरदस्त फटका बसला. यामध्ये मसूद अझहरची मोठी बहीणही मारली गेली. जैशच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं की, मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात उद्ध्वस्त झालं आहे. अब्दुल रीफ यांची नातवंडं, बाजी सादियाचे पती आणि त्यांची चार मुलंही जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि लहान मुलांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. याच दिवशी सर्व मृतांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार मसूद अझहरचा एक अतिशय जवळचा सहकारी, त्याची आई आणि आणखी दोन नातेवाईकदेखील हल्ल्यात ठार झाले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूर येथील सुभान अल्लाह कंपाऊंडवरही लक्ष केंद्रीत करून कारवाई झाली आहे.
या भीषण हल्ल्यानंतर मसूद अझहरने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारताच्या हल्ल्यात मी मेलो असतो, तर तेच बरे झाले असते. आता भारत कोणालाही क्षमा करणार नाही,” असे आत्मपरीक्षणही त्याने व्यक्त केलं.