yuva MAharashtra सांगली समाचारची बातमी ठरली खरी... खा. विशालदादा म्हणाले "पुढील पाच वर्षे मी अपक्षच राहणार !"

सांगली समाचारची बातमी ठरली खरी... खा. विशालदादा म्हणाले "पुढील पाच वर्षे मी अपक्षच राहणार !"


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० एप्रिल २०२५

सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी, अखेर, "आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून आगामी पाच वर्षेही अपक्षच राहणार असल्याचे" ठामपणे सांगितले. खानापूर तालुक्यातील पारे गावातील ग्रामदैवत दर्गोबा यात्रेनिमित्त ते येथे आले होते. त्यांच्यासोबत आमदार सुहास बाबरही उपस्थित होते.

दरम्यान ११ एप्रिल २०२५ रोजी मिरजेतील एका कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील म्हणाले होते, "मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत. आमच्या शेजारीच गोरेंची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मी पण प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. आम्ही पण पुढे जावे, अशी आशा आहे.

त्यावेळेस सांगली समाचारने खा. विशाल पाटील यांच्या वक्तव्यावर उहापोह करताना खालीलप्रमाणे विश्लेषण केले होते...

मिश्किल स्वभाव आणि वाकबॉम्ब! 


खा. विशाल पाटील हे जाहीर कार्यक्रमात असे वाकबॉम्ब टाकण्यात वाकबगार आहेत... मध्यंतरी विधानसभा निवडणुक दरम्यान आ. सुहास बाबर यांच्याबाबत असेच खळबळजनक वक्तव्य केले होते. तर कवठे महांकाळ येथील जाहीर सभेत अशीच खळबळ उडवून दिली होती. नंतर या दोन्ही ठिकाणच्या वक्तव्यावरून घुमजाव केले होते.

त्यामुळेच कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. खरंच खा. विशाल पाटील 'कॉंग्रेसचा हात' सोडणार का ? आणि सोडलाच तर ते भाजपसोबत जातील की अजित पवार यांच्यासोबत ? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण त्यांच्या काकी श्रीमती जयश्रीताई पाटील कॉंग्रेस मधून निलंबित झाल्यानंतर त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसू लागल्या आहेत. त्यामुळेच खा. विशाल पाटील हे ही त्यांच्यापाठोपाठ अजित पवार यांच्या गोटात सामील होऊन केंद्रात अजित पवार वाट्याचे मंत्रिपद मिळवू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


पण सध्या उठलेले राजकीय चर्चेचे वादळ खा. विशाल पाटील यांचे याबाबत 'पुनश्च घुमजाव' वक्तव्यानंतर पेल्यातील ठरते ? की खरंच खा. विशाल पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम राहून 'पुढचे पाऊल' उचलतात, हे येणारा काळच ठरवेल.

अखेर पारे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. "मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र मी स्पष्ट सांगतो – माझी विचारधारा भाजपपासून खूप वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे त्यांनी ठामपणे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले, "अशा चर्चा येत्या पाच वर्षांत सुरूच राहतील, पण त्याला काही इलाज नाही."

विशाल पाटील यांनी आपल्या यशाचा श्रेय पारे गावातील जागृत देवस्थान असलेल्या दर्गोबा महाराजांना दिला. "गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी येथे आलो होतो, तेव्हा स्थानिकांनी हे देवस्थान जागृत असल्याचे सांगितले होते. त्या वेळीच मला येथे दर्शनासाठी यावे, अशी भावना दर्गोबांनी प्रकट केली होती. त्यानंतर मला मोठे यश मिळाले आणि आज मी खासदार म्हणून पुन्हा या ठिकाणी आलो आहे," असे ते म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, "राजकीय मतभेद असले तरी या भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आमदार अनिल बाबर यांनी या परिसरात उल्लेखनीय कामे केली आहेत आणि मी देखील काही विशेष उपक्रम राबवणार आहे, हे येत्या काळात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल."