| सांगली समाचार वृत्त |
आर्वी - दि. १४ एप्रिल २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करताना सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा १० तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे ८० टक्के महाराष्ट्रात ही योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, जिथे दर ५ वर्षांनी विजेच्या बिलात कपात केली गेली आहे. आता तर दरवर्षी वीज बिलात सवलत मिळणार असून, यामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल."
लोअर वर्धा प्रकल्पाच्या माध्यमातून ५०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यामुळे वर्धा जिल्हा सौरऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल. नेरी मिर्झापूर हे गाव पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे राज्यातील एक महत्त्वाचे उदाहरण ठरले असून, त्यांनी अभिनंदनास पात्र कामगिरी केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी विहीर पुनर्भरण योजनेवरही भर देण्यात येणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. “जर आपण पाण्याचा असाच अति वापर करत राहिलो, तर भविष्यात आपलाच प्रदेश कोरडाठिकाणात परिवर्तित होण्याची शक्यता आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या प्रत्येक घरावर सौर उपकरणे बसवली जाणार असून, त्यातून नागरिकांना मोफत वीज मिळू शकेल. घरबांधणीसाठी २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. "मी स्वतः काही काळ वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, त्यामुळे या भागावर माझे विशेष लक्ष राहणार आहे," असेही त्यांनी नमूद केले.
बार्शी उपसा सिंचन योजनेस मंजुरी देताच त्या फाईलवर सही करून मी येथे आलो आहे, असे सांगत त्यांनी वर्ध्यातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचा दिलासा दिला. नवीन रस्ते आणि कनेक्टिव्हिटीमुळे रोजगारनिर्मिती होईल, तसेच विदर्भात भरीव गुंतवणूक होत असून, सुमारे ७ लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "ही गुंतवणूक वर्धा जिल्ह्यासाठीही फायदेशीर ठरणार आहे," असे ते म्हणाले.