yuva MAharashtra हरवलेल्या आजोबांसाठी आजीची तगमग: एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने झाली पुन्हृहा दयस्पर्शी भेट !

हरवलेल्या आजोबांसाठी आजीची तगमग: एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने झाली पुन्हृहा दयस्पर्शी भेट !

फोटो सौजन्य  - दै. सकाळ

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ एप्रिल २०२५

सांगली बसस्थानकावर सोमवारी (ता. ७) एक हळव्या क्षणांची घटना घडली. वयोवृद्ध पती-पत्नींच्या वाटेला आलेली विसंगती आणि एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली काळजी यामुळे अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. हरवलेले आजोबा आणि त्यांना शोधण्यासाठी धावपळ करणारी आजी यांची भेट अखेर घडली आणि आजीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले.

इंग्रुळ (ता. शिराळा) येथील वयाच्या ८० पार गेलेले तुकाराम आणि शांताबाई गायकवाड हे वृद्ध दाम्पत्य चैत्री वारीसाठी पंढरपूरला गेले होते. दर्शनानंतर परतीच्या वाटेवर सांगली बसस्थानकावर ते उतरले. आजीच्या हाती सामान असताना आजोबा कधी आणि कुठे निघून गेले, याचा पत्ता लागला नाही. काही वेळाने आजीने वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षकांकडे मदतीसाठी धाव घेतली.

प्रथम काहीच माहिती मिळाली नाही. मग नातवाचा मोबाईल नंबर आजीने दिला. फोनवरून संवाद साधल्यावर नातवाने आजीला घरी पाठवण्याची सूचना दिली, पण आजोबा सापडल्याशिवाय आजी काही हलल्या नाहीत.


शेवटी वाहतूक नियंत्रक शामराव गावडे, सुरक्षारक्षक बाळासाहेब ठिगळे आणि कर्मचारी सुशील कांबळे यांनी शेजारच्या कोल्हापूर बसस्थानकात शोध घेतला असता, झोपलेल्या अवस्थेत आजोबा आढळले. आजीला तेथे नेल्यावर त्यांनी आनंदाने त्यांची ओळख पटवली.

अशी पुनर्भेट पाहून उपस्थितांच्या मनात एक वेगळीच भावनिक लाट उठली. आजी म्हणाल्या, “वारी गेली वीस वर्षे मी माझ्या सासऱ्यांसोबत केली. यंदा पतींचं वय झालंय, म्हणून मी एकटी जाईन म्हणत होते, पण ते काही थांबलेच नाहीत.”

वाहतूक कर्मचाऱ्यांनी दोघांना इस्लामपूरच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसवले आणि नातवाला फोन करून पुढील व्यवस्था केली. आजीच्या हातात थंड पाण्याची बाटली देत स्नेहपूर्ण निरोप दिला. “आपल्याजवळ कोणी नसतानाही ही काळजी घेतली,” असे म्हणत आजीने अश्रूंतून आभार व्यक्त केले.