Sangli Samachar

The Janshakti News

Exit Polls चा खोटेपणा? दोन्ही शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ तर पाच जागा लढवणारा पक्ष 6 जागांवर विजयी ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान काल संध्याकाळी 6 वाजता संपले आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर संध्याकाळी 6:30 विविध वृत्तवाहीन्यांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले. दरम्यान या एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा एकदा मोदी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडी 350 पेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचे दाखवले जात होते. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी एक्झिट पोल्समधील काही त्रुटी शोधत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचबरोबर यामध्ये खोटेपणा असल्याचा आरोप अनेक युजर्स करत आहेत.

शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ

दरम्यान एका एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील 48 जागांमध्ये सर्वाधिक 20-22 जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असे सांगितले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेने 8-10 जागा जिंकेल असे सांगण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेना 9-11 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. सोशल मीडिया युजर्सनी एक्झिट पोलमध्ये काही त्रुटी शोधल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, "महाराष्ट्रात शिंदे 15 जागा लढवत आहे त्यातल्या 13 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहेत. मग शिंदे यांना 8-10 जागा आणि ठाकरेंना 9-11 जागा कुठून मिळत आहेत?" अस प्रश्न उपस्थित केला आहे.


पाच जागा लढणारा पक्ष सहा जागांवर विजयी

काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजपसह एनडीएला कौल दिल्याचे दाखवले आहे. येथे भाजप 13-15, संयुक्त जनता दल 9-11, लोकजनशक्ती पार्टी 4-6, राष्ट्रीय जनता दल 6-7 आणि इतर 1-6 जागांवर जिंकतील असा अंदाज एका एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला आहे. पण यामध्ये गमतीशीर बाब अशी की बिहारमध्ये फक्त पाच जागांवर निवडणूक लढवणारी लोकजनशक्ती पार्टी जास्त्तीत जास्त 6 जागा जिंकेल असे सांगितले आहे. दरम्यान सोशल मीडिया युजर्सनी यावर आक्षेप घेतल्यानंतर एक्झिट पोल्सविषयी मोठ-मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.