Sangli Samachar

The Janshakti News

शुद्ध प्रसादासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला !


| सांगली समाचार वृत्त |
त्र्यंबकेश्वर - दि. ११ जून २०२४
मंदिरांमध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे. भाविकांचे आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली असून योग्य आणि आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धार्मिक आस्थांशी निगडीत असलेला प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या आहेत. प्रसाद शुद्धीच्या चळवळीची सुरुवात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून होणार आहे.

मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित रहावी यासाठी हिंदुत्व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. प्रसाद विकणाऱ्या दुकानांना 'ओम सर्टिफिकेट' दिले जाणार आहे. हिंदूंच्या आराध्याला अर्पण करण्यात येणारा प्रसाद हा सात्विक आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये अशुद्ध घटक वापरले जात नाहीत ना याची खात्री केली जाणार आहे. सर्व योग्य पद्धतीने सुरू असल्यास संबंधितांना 'ओम सर्टिफिकेट' दिले जाणार आहे.


या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकानं असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वर्ज्य पदार्थाचा वापर होत नाही ना याची पाहणी केली जाणर आहे. सर्व आलबेल असलेल्या दुकानांना 'ओम सर्टिफिकेट' दिले जाणार आहे. यामुळे भाविकांच्या श्रद्धास्थानाला आणि श्रद्धेला ठेच पोहचणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे अध्यक्ष रणजीत सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू केली आहे. याची सुरुवात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री यांनी या चळवळीबद्दल बोलताना म्हटलं आहे की, प्रसाद अशुद्ध असेल तर त्याचे फळ विपरीत मिळते.

मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रासादामध्ये अनेकदा विधर्मी व्यक्तिंद्वारा भेसळ केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. प्रसादात बनावट तूप, पदार्थ, गाईची चरबी वापरल्याच्या घटना घडत असल्याचे वृत्त समोर येत असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि हिंदू धर्मियांचे पावित्र्य राखण्यासाठी 'ओम प्रतिष्ठान' काम करणार आहे. गुरुवारी १४ जून रोजी या चळवळीचा शुभारंभ होणार आहे.