Sangli Samachar

The Janshakti News

एक्झिट पोलच्या निकालानंतर पीएम मोदी ॲक्शन मोडमध्ये, बैठक पहिल्या १०० दिवसांचा अजेंडा तयार !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ जून २०२४
मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडल्यावर अनेक एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. एक्झिट पोलनुसार, सलग तिसऱ्यांदा मोठ्या बहुमताने एनडीए सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ४५ तासांच्या ध्यानानंतर कन्याकुमारीहून राजधानीत परतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते परत येताच पंतप्रधान पीएमओ अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेणार आहेत. या बैठकीत पहिल्या १० दिवसांचा अजेंडा त्यांनी तयार केला आहे. मोदी सरकार तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या १०० दिवसांत काय करायचे आहे याची यादी त्यांनी तयार केली आहे.

पहिल्या १०० दिवसांत घेणार अनेक मोठे निर्णय

पहिल्या १०० दिवसांतच अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. यासाठी २०२९ ची वाट पाहण्याची गरज नाही. अशा स्थितीत पहिल्या १०० दिवसांतच करण्यात येणाऱ्या महत्वाच्या कामांची याधी तयार करण्याचे आदेश मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मोदी सरकारच्या निर्णयांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत सरकार मोठे निर्णय घेईल असे मानले जात आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. मात्र, निवडणुकीचे निकाल येणे बाकी आहे. यावेळी निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यात आला.


नवीन सरकारच्या स्थापनेनंतर, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिसकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची प्रथम नियुक्ती केली जाऊ शकते. नवीन लष्करप्रमुख आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकांचीही एका महिन्यात नियुक्ती केली जाऊ शकते. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींच्या संकल्पानुसार मोदी सरकारचे लक्ष लष्करी औद्योगिक संकुलावर असेल. पीएमओच्या अधिकाऱ्यांनी शपथविधीनंतर १०० दिवसांचा अजेंडा तयार केला आहे. याशिवाय भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांवरही काम सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी १३ जून रोजी होणाऱ्या जी ७ बैठकीतही सहभागी होऊ शकतात.

मंगळवारी होणार चित्र स्पष्ट

किमान तीन एक्झिट पोलमध्ये एनडीएला ४०० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलपूर्वीच काँग्रेसने दावा केला होता की भारत आघाडी किमान २९५ जागा जिंकणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रात कोणाचे सरकार बनते हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.