Sangli Samachar

The Janshakti News

आला रे मॉन्सून आला! केरळ, उत्तर-पूर्व भारतात एकत्रच दाखल ! राज्यात लवकरच करणार प्रवेश !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२४
देशात उष्णतेमुळे जिवाची लाही लाही झाली आहे. असे असतांना पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय हवामान विभागाने मॉन्सून बाबत महत्वाची अपडेट दिली आहे. मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. हवामान विभागाने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.

नैऋत्य मोसमी मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारताच्याही बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागानं ट्वीट करून दिली आहे. देशात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळामुळे केरळ आणि ईशान्य भारतात मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. मान्सून वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी केरळ आणि काही ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून एकाच वेळी दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडी नुसार उत्तर पश्चिम भारतात गुरुवारपासून उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.


विशेष म्हणजे साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो तर,५ जूनपर्यंत, मॉन्सून हा ईशान्येकडील बहुतेक राज्यांमध्ये दाखल होतो. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळामुळे यंदा मॉन्सून हा दोन्ही प्रदेशात एकाच वेळी दाखल होणार आहे. चक्रीवादळामुळे परिसरात मान्सूनचा प्रवाह वेगाने पुढे आल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवामान विभागाने सांगितले की, 'केरळ आणि ईशान्येतील काही भागात येत्या २४ तासांत मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होणार आहे. गुरुवारपासून उत्तरेकडील भागात उष्णतेची लाट येईल. दिल्ली-एनसीआरसह पश्चिम आणि मध्य भारतात हळूहळू तापमान कमी होणार आहे.

१५ मे रोजी हवामान खात्याने केरळमध्ये ३१ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख ५ जून आहे.

या कालावधीत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग, कोमोरिन, लक्षद्वीप, नैऋत्य आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागांवर प्रबळ होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पश्चिम मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

१० मे नंतर केरळमधील १४ केंद्रे आणि शेजारील भागात २.५ मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास, आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन (OLR) पेक्षा कमी असेल आणि वाऱ्याची दिशा असेल तेव्हा हवामान खाते केरळमध्ये मान्सूनचे दाखल झाल्याचे घोषित करते.