Sangli Samachar

The Janshakti News

यापुढे माझा प्रत्येक क्षण भारतासाठी; मुंबईतून मोदींची गॅरंटी



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ मे २०२४
ज्यांना राम मंदिर निर्माण होणं अशक्य वाटत होतं, ज्यांना ३७० कालम हटवणं अशक्य वाटत होतं, त्यांच्या सर्व अशक्यतांना मी गाढून टाकलंय आणि नवीन भारत उभा केलाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षात देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या २०४७ सालचे ड्रीम घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठे असेल.


भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेलेत. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती. मी असे काही पंतप्रधान पाहिलेत की, त्यांनी लाल किल्यावरून भारतीयांना आळशी महटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसं असतं तर देश किमान पाच दशकं पुढे असता. या सत्ताधा-यांनी देशाची पाच दशके ही वाया घालवली. सन २०१४ मध्ये ज्यावेळी काँग्रेस गेली, त्यावेळी भाजप सत्तेत आलं त्यावेळी देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. येत्या काही काळात देश जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक ताकद असणार आहे ही मोदींची गॅरंटी आहे. 

मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी २४ तास देशासाठी काम करणार आहे. निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणे हे काही चणे खाण्याचं काम नाही.

राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या ५०० वर्षात जे काही झालं नाही ते मोदीने करून दाखवलं. काश्मीरमधून ३७० कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाढून टाकलंय. काँग्रेसने गेल्या ६० वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं. ज्यांना स्वाभिमानानं जगायचं असेल त्यांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. मतदानाला बाहेर पडताना आधी झालेले बाँब धमाका आठवा आणि मतदान करा. मोदीला बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.