Sangli Samachar

The Janshakti News

नव्या संकटाचे संकेत? अचानक बदलला नद्यांचा रंग; शास्त्रज्ञानीही व्यक्त केली चिंता !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२४
तसा पाण्याला रंग नसतो, पण जगात अशा काही नद्या आहेत, ज्यातील पाणी वेगवेगळ्या रंगाचं आहे. ॲमेझॉनमधील रिओ निग्रो नदीचं पाणी काळं, बोस्निया-हर्जेगोविना-सर्बियामधील ड्रिना नदीचं पाणी हिरवं, तर कोलंबियातील कानो क्रिस्टालेस नदीचं पाणी रंगबेगरंगी आहे. या नद्यांच्या पाण्याचा रंग आधीपासूनच असा पण काही नद्या अशा आहेत, ज्यांच्या पाण्याचा रंग अचानक बदलला आहे. ज्यामुळे शास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. अलास्कातील काही नद्या नारंगी रंगाच्या झाल्या आहेत. या अनोख्या घटनेकडे संशोधक आणि लोकांचं लक्ष लागलं आहे. या नद्या अतिशय गजबजलेल्या भागात आहेत. यामध्ये कोबुक व्हॅली आणि गेट्स ऑफ आर्क्टिक सारख्या राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे.

नॅशनल पार्क सर्व्हिस आर्क्टिक इन्व्हेंटरी अँड मॉनिटरिंग नेटवर्कचे डॉ. जॉन ओ'डोनेल यांनी पहिल्यांदा 2018 मध्ये पाण्याच्या रंगात झालेला बदल लक्षात घेतला. तथापि, 2008 मधील उपग्रह प्रतिमा दर्शवतात की पाणी आधीच दूषित होण्यास सुरुवात झाली होती. ही समस्या कालांतराने लहान नद्यांपासून मोठ्या नद्यांपर्यंत पसरत असल्याचं दिसून येतं. डॉ. जॉन ओ'डोनेल म्हणाले की, त्यांनी जितकं अधिक सर्वेक्षण केलं, तितक्या अधिक नारंगी नद्या आणि प्रवाह पाहिले. यूसी डेव्हिस येथील पर्यावरणीय विषविज्ञानाचे सहायक प्राध्यापक ब्रेट पॉलिन यांच्या मते, रंग इतका स्पष्ट आहे की काही डाग स्पॉट्स अंतराळातूनही दिसतात.


का बदलला नद्यांचं रंग ?

शास्त्रज्ञांनी उत्तर अलास्कातील ब्रूक्स माउंटन रेंजमधील 75 ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेतले. दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लोह, जस्त, निकेल, तांबे आणि कॅडमियमची उच्च पातळी दिसून आली. काही पाण्याच्या नमुन्यांचा pH 2.3 इतका कमी होता, जो सामान्य नदीच्या pH पेक्षा जास्त आम्लयुक्त होता. नारंगी रंगाचं कारण म्हणजे नदीत लोहाचं अस्तित्व. लोह हा पर्यावरणातील सर्वात विपुल धातूंपैकी एक आहे. उष्ण तापमानामुळे पर्माफ्रॉस्ट वितळलं की, त्यात साठवलेली खनिजं पाण्यात सोडली जातात. जेव्हा ही खनिजं, विशेषत: धातूची अयस्क, हवा आणि पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते अॅसिड आणि धातू सोडतात.

नव्या संकटाचे संकेत ?

नेचर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार हा नारंगी रंग हवामान बदलाचा परिणाम आहे, पर्यावरणीय समस्यांचं लक्षण आहेत. जसजसं तापमान उबदार होत जाईल, पर्माफ्रॉस्ट वितळत राहतील, संभाव्यत: खनिजं नद्यांमध्ये मिसळतील. एवढंच नाही तर या नद्या आणखी नारंगी होऊ शकतात आणि पाण्याची गुणवत्ताही बिघडू शकते.

नद्यांचा नारंगी रंग चिंतेचं कारण ?

पाण्यात लोह आणि इतर धातू असल्यामुळे नदी पूर्णपणे विषारी होऊ शकते. या धातूंच्या उपस्थितीमुळे माशांना हानी पोहोचते आणि जैवविविधता देखील कमी होते. पाण्याच्या गुणवत्तेचा परिणाम केवळ माशांवरच होत नाही, तर माणसांवरही होतो. विशेषतः ग्रामीण भागात राहणारे लोक पिण्याच्या पाण्यासाठी या नद्यांवर अवलंबून आहेत. पाण्यात धातू असल्याने त्याचा रंगच नाही तर चवही बदलू शकते.