Sangli Samachar

The Janshakti News

मराठी माणसाची संशाेधक वृत्ती आणि 'पिनकोड'च्‍या जन्‍माची गोष्ट...



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
मुंबई -  तंत्रज्ञानाच्या जगात पोस्ट ऑफिस, टपाल, पोस्टमन, पत्र हे शब्द ऐकायला मिळाले तरी आपल्या कित्येक आठवणी जाग्या होतात. 'टपाल…' अशी पोस्टमन काकांची आरोळी असो किंवा शाळेत आपल्याला शिक्षकांनी पत्र लिहायला सांगण असो. अशा कित्येक आठवणी नकळत आपल्‍या मनात जाग्या होतात; पण कधी प्रश्न पडतो का पत्रावर लिहला जाणाऱ्या पिनकोडची नेमकी कल्पना कोणाची होती?. या पिनकोडची कल्पना श्रीराम भिकाजी वेलणकर यांना सुचली होती. आज त्यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त जाणून घेवूया पिनकोडची गोष्ट. (PIN Code)

 आजही पिनकोडचे महत्त्व अबाधित

भारतासारख्या विशाल क्षेत्रफळ, विविध राज्ये, भाषा यांच्यासह नावात साम्य असणारी गावे पाहतो; पण अपुरे पत्ते, गावातील साम्य यासारख्या अडचणी पार पाडत पोस्ट खाते आपलं काम अविरतपणे करत आले आहे. तंत्रज्ञानामुळे आपलं जगणं बदलत असले तरी काही गोष्टींचे महत्त्‍व अबाधित असते. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातील एक गोष्ट म्हणजे पिनकोड. ई-मेल आणि सोशल मीडियाच्या जगात पिनकोड कमी प्रमाणात वापरला जात असला तरी. कुरीयर सर्व्हिस, फुडसर्व्हिस, बॅंक, शाळा-कॉलेज अशा बऱ्याच ठिकाणी पिनकोड मागत असल्याने आजही त्याचे महत्त्व अबाधित आहे.


भारतीय पिनकोडचे जनक श्रीराम वेलणकर

एखाद्या व्यक्तीच्या पुढे पिनकोड लिहिला तरी आपल्याला समजते की, ती व्यक्ती कोणत्या भागात राहते. याच पिनकोड प्रणालीचा शोध श्रीराम भिकाजी वेलणकर या मराठी माणसाने लावला. कोकणात जन्मलेल्या श्रीराम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील विल्सन कला शाखेतून केले. १९३८ ला घेण्यात आलेल्या आय.सी. एस परिक्षेत ते पहिले येवुनही त्यांना डावलण्यात आले. त्यांची निवड १९४० मध्ये भारतीय टपाल तार खात्यात प्रथम वर्गाचे अधिकारी म्हणून करण्यात आली. त्‍या काळात वाढत्या पत्रसेवेमुळे अनेक अडचणी उदभवत होत्या. निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते, एकसारखी नावे, एकसारखी गावे अशा बऱ्याच अडचणी होत्या. यावर उपाय म्हणुन श्रीराम वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड ही पध्दत अंमलात आणली. वेलणकर केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते, तेव्हा सुचलेली ही कल्पना १५ ऑगस्ट १९७२ रोजी अंमलात आणली. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पिनकोड मागितला जातो; पण तो पिनकोड कसा वाचायचा हे खूप कमी लोकांना माहीत असते. आपला पिनकोड हा सहा अंकी असतो. यातील प्रत्‍येक अंकाला एक विशिष्‍ट अर्थ आहे. या पिनकोडवरुन तुम्ही कोणत्या प्रादेशिक भागात आहात हे स्पष्ट होतं. आपला पिनकोड हा सहा अंकी असतो. यासाठी देशाचे १ ते ९ असे विभाग पाडले आहेत. त्यातील १ ते ८ हे भौगेलिक विभाग असून नववा विभाग हा सैन्यदलासाठी राखीव आहे. सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक - विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक- सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा  नंबर असतो.