Sangli Samachar

The Janshakti News

लिफाफ्यातून सांगली जिल्ह्यातील मतदार मला मतांचा आहेर देतील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२३ एप्रिल २०२४
सांगली जिल्ह्यातील विधानसभेचे निवडणूक असो किंवा लोकसभेच्या. प्रचाराचा नारळ हा येथे ठरलेला. आणि आपापसातील मतभेद याच औदुंबरच्या डोहात बुडवण्याचे वचने घेतले जायची. अर्थात् ही वचने परत येताना त्याच औदुंबर च्या डोहात सोडून द्यायचे, हा आजपर्यंतचा इतिहास. आणि या इतिहासाची पुनरावृत्ती सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केली. औदुंबर परिसरातील दादा प्रेमींच्या उपस्थितीत श्री दत्तात्रयाच्या चरणी नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

आपल्यावर पक्षातर्फे कारवाई होणार का ? याविषयी विशाल दादा म्हणाले, मला आज पर्यंत पक्षाकडून उमेदवारी दाखल करू नये याबाबत कुठलीही नोटीस आली नाही. त्यामुळे मी पक्षाच्या कुठल्याही आदेशाचे उल्लंघन केलेले नाही म्हणून पक्ष आपल्यावर कारवाई करेल असे वाटत नाही. कार्यकर्त्यांना काम करायला सांगण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचे काम सुरू केले आहे. नेत्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्यावर धर्म संकट आहे, हे आम्ही समजू शकतो, त्यामुळे त्यांच्याबाबत मनात कुठली आहे व राग नाही. परंतु आमच्या प्रचाराची हेच वैशिष्ट्य आहे, आमच्याकडे येणारा प्रत्येक जण मनाने येतो. परंतु दुसरीकडे जाणारा प्रत्येक जण दडपणामुळे जातो. त्यांच्या मनात मात्र जे जनतेच्या मनात आहे, तेच आहे. आणि जनतेच्या मनात लिफाफा आहे त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. आणि या लिफाफ्यात जनता मला मतांचा आहे देणार आहे.

जतच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विशाल दादा म्हणाले, जत तालुका हा मोठा तालुका आहे. लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ एक तृतीयांश भाग हा जत तालुक्यातील आहे. आणि वसंतदादांच्या काळापासून त्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी मिळावे हे प्रयत्न होत आहेत. या भागात जास्तीत जास्त एमआय टॅंक बांधण्याचे काम वसंतदादांनी केले. हे एमआय टॅंक भरण्यासाठी म्हैसाळ आणि ताकारी योजनेची सुरुवात ही वसंतदादांनीच केलेली आहे. आणि याला केंद्र शासनाचा दर्जा मिळवून दिला तो प्रत्येक दादा पाटील यांनी. 

परंतु गेल्या दहा वर्षात हे काम अपूर्ण राहिलेले आहेत. विद्यमान खासदाराने केवळ आम्ही केलेल्या कामाचे नारळ फोडणे इतकच केलं. या कामासाठी या भागातील आमदारांनी निधी मिळवून आणला, त्याचे श्रेय ही खासदारांनीच घेतले. हे सारे जत तालुक्यातील जनतेला ठाऊक आहे. आणि म्हणूनच जत तालुक्यातील जनतेने त्यांच्या आशा माझ्यावर सोपवलेले आहेत. आता या साऱ्यांची भेट घेऊन यशाचा गुलाल आम्ही सारे लावून घेणार आहोत.

एकंदरीत विशाल पाटील यांनी प्रचाराचा सुरुवात औदुंबर येथे नारळ वाढवून केली असली, तरी त्याचा धुमधडाका जत तालुक्यापासून सुरू होणार आहे. जत तालुक्यातील तसेच शेजारच्या कवठेमंकाळ तालुक्यातील भाजपमधील नाराजांचा विशाल पाटील यांना मोठा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

येणाऱ्या काळात विशाल पाटील यांच्या पाठीशी अजून कोण कोण उभे राहते याचे उत्तर लपलेले आहे, त्यामुळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांच्यावर नाराज न होता पुढे जाण्याचे धोरण विशाल दादांनी स्वीकारलेले दिसते.