Sangli Samachar

The Janshakti News

ऊठसूट गोळ्या घेऊ नका...अतिसेवनाने होऊ शकतो जीवघेणा आजार !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२७ एप्रिल २०२४

डोकं दुखलं, की घे गोळी, सर्दी-ताप आला, की घे गोळी... असे प्रकार अनेकजण करतात. मात्र, छोट्या-मोठ्या आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधगोळ्यांच्या अतिसेवनाने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे तर अप्लॅस्टिक ॲनमियासारखा जीवघेणा आजारही संभवतो. 

शरीरातील अस्थिमज्जेमधून (बोनमॅरो) सर्वच रक्तपेशी तयार होणे कमी होते. म्हणजे रक्त तयार करणाऱ्या संस्था कमी होतात, तेव्हा अप्लॅस्टिक अ‍ॅनेमिया होतो. हा आजार जुनाच असला, तरी तो काहींना आनुवंशिकतेने, रासायनिक औषधी फवारून पिकवलेल्या अन्नधान्याने, एक्स-रेच्या जास्त थेरपीने अथवा औषध गोळ्यांच्या अतिसेवनाने संभवतो. वेळीच उपचार केल्यास याला रोखता येते; अन्यथा लाखो रुपये खर्च करूनही रुग्ण दगावू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.


अ‍ॅनेमियाचे घाटी रुग्णालयात महिन्याकाठी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात ही संख्या दुप्पट आहे. विशेष म्हणजे, अप्लॅस्टिक अ‍ॅनेमिया आजाराचे मूळ कारण आतापर्यंत समोर आलेले नाही, आधुनिक उपचारपद्धतीने या अवजारातून सर्वसामान्य जीवन रुग्णाला जगता येते. या आजारात रुग्णाला परत-परत पांढऱ्या पेशी देण्याची गरज पडते. 

लाल (लोहित) व पांढऱ्या पेशी वाढविणाऱ्या संस्था कमी होतात. लाल पेशीची संख्या कमी झाल्यानंतर अ‍ॅनेमिया हा आजार होते. या पेशी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. पांढऱ्या रक्तपेशी शरीर संरक्षका म्हणून काम करतात. यासह प्लेटलेट्स (रक्तकणिका) शरीरातील रक्तस्त्रावापासून बचाव करतात. या आजारामुळे त्या कमी होतात. यामुळे शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. तथापि, ही व्याधी म्हणजे कर्करोग नव्हे, पेशी किती प्रमाणात कमी झाल्या, त्यावरून अप्लॅस्टिक अ‍ॅनेमियाची व्याप्ती कळते.


काय काळजी घ्यावी ?

ताजे व चांगले शिजवलेले अन्न खावे, कच्चा भाजीपाला खाणे टाळा, फळे ही साल काढून खावीत. आहारात प्रथिनयुक्त अंडे-मांस खावे. ग्रेपट्टीन बिस्कीट, सोया, पनीर, भाजलेला सुकामेवा खावा; तसेच अंघोळीच्या पाण्यात जंतुनाशक टाका. वेळोवेळी रक्ताची तापसणी करा, हिमोग्लोबीन सातपेक्षा कमी होऊ देऊ नका, प्लेटलेट्सवर लक्ष ठेवून राहा.

मनाने औषधी घेण्याचे केवळ फायदेच लोकांना जाणवतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील असतात. मेडिकलवरुन शक्यतो अँटिबॅटिक, स्टुराईड, पेनकिलर टॅबलेट घेतल्या जातात. याचे दीर्घ काळ दुष्परिणाम जाणवतात. सतत अशा प्रकारे औषधी घेतल्याने पोटाचे आजार, अल्सर, एनिमिया, किडनी विकार यांचा धोका संभवतो.

उपाय काय ?

रक्त, प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर तत्काळ डॉक्टरांना दाखवा. आजाराच्या लक्षणानुसार गोळ्या अथवा एटीजी इंजेक्शन घेणे गरजचे आहे, ज्याचा खर्च तीन ते सहा लाख येतो तर मुंबई, पुण्याला दुप्पट खर्च येतो. रुग्ण तिसऱ्या स्टेजला असेल, तर त्यांना बोनमॅरो डोनरच्या माध्यमातून ट्रॉन्सप्लांट हा पर्याय असतो. स्टेमपेशीचे रोपण हा पर्याय असतो.

आजाराची लक्षणे

लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स कमी होणे, थकवा जाणवणे, सुस्ती येणे, दम लागणे, चक्कर येणे, घबराट होणे, डोळे व जीभ पांढरी वाटणे, सतत डोके दुखणे, कानात आवाज येणे, वारंवार घसा दुखणे, ताप येणे, छातीत संसर्ग, त्वचेचा संसर्ग, ब्रश करताना हिरड्यातून रक्त येणे, नाकातून रक्त, तोंडात फोड, स्त्रियांच्या मासिक पाळी जास्त दिवस चालणे, जास्तीचा रक्तस्त्राव होणे, अंगावर लाल डाग, पुरळ उठणे.