Sangli Samachar

The Janshakti News

ओटीपी द्वारे होणारी फसवणूक थांबणार मिळणार त्वरित 'अलर्ट' !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२६ एप्रिल २०२४
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी वापरला जातो. असे असताना फसवणूक करणारे यशस्वी होतात. अनेक वेळा लोक स्वत: ओटीपी देतात, तर काही वेळा फसवणूक करणारे मोबाइल हॅक करून फसवणूक करतात. ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने अलर्ट सिस्टम आणण्याचा विचार सुरू केला आहे. यासाठी गृह मंत्रालय, एसबीआय कार्ड आणि टेलिकॉम ऑपरेटर एकत्रितपणे काम करत आहेत. या प्रणालीमध्ये फसवणूक करणाऱ्याने ग्राहकाचा ओटीपी घेतल्यास त्या व्यक्तीला धोक्याची सूचना दिली जाईल आणि फसवणूक थांबवता येईल.

ओटीपी मिळाला तरी फसवणूक होणार नाही 
रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक टाळण्यासाठी दोन पर्यायांवर काम केले जात आहे. ओटीपी डिलिव्हरीचे ठिकाण आणि ग्राहकाच्या सिमच्या लोकेशनमध्ये काही फरक असल्यास, एकतर डिव्हाइसवर एक अलर्ट पॉपअप केला जाईल किंवा ओटीपी पूर्णपणे ब्लॉक केला जाईल. यामुळे सायबर गुन्हेगारांना पेमेंट करण्यासाठी ओटीपी मिळाला तरी ते फसवणूक करू शकणार नाहीत.


नेमके काय करणार केंद्र सरकार ? 

सिस्टममध्ये ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यासह त्याच्या सिमचे ठिकाण आणि ओटीपी कॉल केलेल्या ठिकाणाचा मेळ बसविण्यात येईल. त्यांच्यामध्ये काही फरक आढळल्यास, ग्राहकाला एक अलर्ट पाठविला जाईल की त्याची फसवणूक होऊ शकते. या योजनेनुसार, टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने ग्राहकांचा डेटाबेस तपासल्यानंतरच ओटीपी पाठवला जाईल.