Sangli Samachar

The Janshakti News

या मंदिरात आहे 'नरकाचा दरवाजा' !



सांगली समाचार- दि. २४ मार्च २०२४
नवी दिल्ली : भारतासह जगात बरीच मंदिरं आहेत. त्यांच्या आख्यायिका वेगवेगळ्या आहेत. असंच एक मंदिर जे 'डोअर्स ऑफ हेल' म्हणजे नरकाचा दरवाजा म्हणून ओळखलं जातं. या मंदिराच्या आत जो जातो त्याचा मृत्यू होतो. अखेर त्या नरकाच्या दरवाजाचं रहस्य उलगडलं आहे.

तुर्कस्तानमधील हिरापोलिस शहरात एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला 'नरकाचा दरवाजा' म्हणतात. असं मानलं जातं की जो कोणी इथं जातो तो कधीही जिवंत परत येत नाही. या मंदिरात कोणी प्रवेश केला तर त्याचा मृतदेह सापडत नाही. त्यात पशू-पक्षी गेले तरी मरतात. म्हणूनच याला 'गेट टू हेल' असं म्हणतात. प्राचीन रोमन आणि ग्रीक काळापासून लोक या ठिकाणी जायला घाबरतात. पण आता शास्त्रज्ञांनी हे रहस्य उकलण्याचा दावा केला आहे.

काय आहे या मंदिराचं रहस्य ?

डेली स्टारच्या वृत्तानुसार, प्राचीन ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ स्ट्रॅबोदेखील इथं आले होते. त्यांनी आपल्या 2000 वर्ष जुन्या पुस्तक 'जिओग्राफिका'मध्ये याबद्दल सांगितलं आहे.

ही एक छोटी गुहा आहे असं त्यांनी पुस्तकात सांगितलं. आत इतकं धुकं आहे की तुम्ही जमिनीवर क्वचितच पाहू शकता. त्यात पाठवलेले जीव मरतात. स्ट्रॅबोने चिमण्यांना त्यात सोडलं तेव्हा काही सेकंदातच त्यांचा मृत्यू झाला. त्यात पाठवलेले बैल लगेच खाली पडतात, त्यांचा मृत्यू होतो, मग त्यांचा मृतदेह खेचून बाहेर काढला जातो. पण ज्या पुरोहितांना नपुंसक बनवून तिथं मरण्यासाठी पाठवलं गेलं होतं ते जिवंत परतले अशीही आख्यायिका आहे. यावर स्ट्रॅबो म्हणाला, कदाचित त्याला नपुंसक बनवल्यामुळे असं घडलं असावं.


बळीसाठी वापरला जात होता गेट टू हेल
प्राचीन लोककथेनुसार, 'गेट टू हेल' हा कथितरित्या प्राण्यांचा बळी देण्यासाठी वापरला जात असे. यामध्ये पक्षी, बैल आणि इतर प्राणी हे देवांचे प्रतिक म्हणून पाहिले जात होते. मंदिराच्या अवशेषांवर पक्ष्यांचे सांगाडे पाहायला मिळतात. खांबांवर देवांचे शिलालेख आहेत. ही मिथक शतकानुशतके कायम होती, परंतु आता शास्त्रज्ञांनी त्याचं रहस्य उघड केलं आहे. शास्त्रज्ञांनी त्याचं वैज्ञानिक सर्वेक्षण केलं.

काय आहे या मंदिरात ?

2018 मध्ये, जर्मनीतील ड्यूसबर्ग-एसेन विद्यापीठातील ज्वालामुखीशास्त्रज्ञ हार्डी फॅन्झ यांच्या नेतृत्वाखालील टीमने इथं सखोल तपासणी केली.

उत्खनन करणाऱ्या फ्रान्सिस्को डीअँड्रिया यांनी सांगितलं की, आम्ही खूप आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या. इथं एक हॉट स्पॉट आहे, तिथं पोहोचताच अनेक पक्षी मरण पावले. त्याचा तपास केला असता वास्तव समोर आलं.

इथं कार्बन डायऑक्साइडची पातळी खूप जास्त असल्याचं आढळून आलं. जसजशी रात्र वाढत होती तसतशी C02 ची पातळी वाढत होती. हीच वेळ होती जेव्हा लहान प्राणी आत फेकले गेले. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू सतत बाहेर पडत असतो. यामुळेच मानव, प्राणी, पक्षी यांचा संपर्क येताच मृत्यू होतो. या मंदिराला भेट देण्याची सर्वात धोकादायक वेळ म्हणजे पहाटे, जेव्हा गुहेतील वायू रात्रभर वाढत राहतो. दिवसा ते कमी होतं कारण सूर्यप्रकाशामुळे गॅस कमी होतो.