Sangli Samachar

The Janshakti News

आज आहे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी... तिथी, पूजा शुभ वेळ, चंद्र अर्घ्य वेळ जाणून घ्या

सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

हिंदूू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी श्रीगणेशा करतो. कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करतो. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मंगळवार आणि बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. तर महिन्यातील गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ही बाप्पाला समर्पित करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, हे जाणून घ्या. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते.

संकष्टी चतुर्थी कधी असते?

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला पहाटे 1:53 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 28 फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

संकष्टी चतुर्थी शुभ वेळ

या दिवशी गणपतीची पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त असणार आहे. पहिला शुभ मुहूर्त हा सकाळी 6.48 ते 9.41 वाजेपर्यंत असणार आहे. दुसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 4:53 ते 6:20 वाजेपर्यंत असणार आहे. या दोन मुहूर्तांमध्ये तुम्ही विधीनुसार गणपतीची पूजा केल्यास शुभ फल मिळतात. तर 28 फेब्रुवारीला चंद्रोदयाची वेळ रात्री 9:42 असणार आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गणेश चालीसा आणि गणेश आरतीचे पठण करणे फलदायी ठरणार आहे.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

धार्मिक मान्यतांनुसार, माता पार्वती काही कारणाने भगवान शंकरांवर कोपली होती, असं सांगण्यात आले आहे. भगवान शंकराने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवले होतं, त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होऊन शिवलोकात आली होती अशी आख्यायिका आहे. हे व्रत देवी पार्वतीला तसंच गणेशालाही प्रिय असून म्हणून याला द्विजप्रिया चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी गौरी-गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 

संकष्टी चतुर्थीची अशी पूजा करा!

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा, सुपारी, लाल फुलं आणि तीळ अर्पण करा. त्याशिवाय 11 दुर्वा अर्पण करा. नंतर 108 वेळा ओम श्रीं गम सौभाग्य गणपतये वरवरद सर्वजन्म मे वशमन्य नमः. या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळं अर्पण करा. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करून गोठ्यात गायींच्या सेवेसाठी पैसे आणि अन्न दान करणे शुभ मानले जाते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. सांगली समाचार  या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)