Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला झापले ! पण का ?


सांगली समाचार - दि. २०|०२|२०२४

मुंबई  - शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन मनसे  पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करा. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

'शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रुजू होऊ नये'

शिक्षकांना निवडणूकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांनी राज ठाकरेंकडे मांडली. यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. मुंबईतील 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहेत, मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो? घाईगडबतीत सर्व काम करुन शाळेवर दडपण का आणत आहेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.