Sangli Samachar

The Janshakti News

उद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

 


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

मुंबई  - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या अर्थात सोमवारी २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर २७ फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला अधिवेशनात २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होणार आहे.

कसे असणार नियोजन ? 

भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडून कामकाज संपेल. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर दुपारी २ वाजता २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. त्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ या चार महिन्यांतील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज आणि लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल.

अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल. शेवटच्या दिवशी लेखानुदान प्रस्ताव आणि लेखानुदान विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येईल. अधिवेशनात अन्य शासकीय विधेयके, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

कोणत्या मुद्दयावर सरकारला घेरणार? 

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहेत. तसेच पुण्यात सापडलेला हजारो कोटींचा अमलीपदार्थांचा साठा, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे वर्तन आणि वादग्रस्त विधाने तसेच शासकीय कर्मचारी भरतीतील घोळ या मुद्यांवरून विरोधी पक्ष सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींच्या सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. या देखील पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे.