yuva MAharashtra महापालिकेच्या आखाड्यात भल्याभल्यांना लागणार कस !

महापालिकेच्या आखाड्यात भल्याभल्यांना लागणार कस !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार, आगामी चार आठवड्यांत निवडणुकांची अधिसूचना जाहीर करावी आणि पुढील चार महिन्यांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

सांगली महापालिकेतील बदलाच्या दिशेने पावले !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नगरसेवकांची संख्या सध्याच्या 78 वरून 85 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नव्याने प्रभाग रचना, नगरसेवक संख्येतील वाढ आणि सत्तास्थापनेचे समीकरण कसे राहणार, याकडे राजकीय वर्तुळातील आणि नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकीचा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

प्रशासक राजाच्या कालखंडानंतर नव्या घडामोडी

सांगली महानगरपालिकेचा नियमित कार्यकाळ 19 ऑगस्ट 2023 रोजी संपला होता, त्यानंतरपासून येथे प्रशासकीय व्यवस्था लागू आहे. दरम्यानच्या काळात राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे आता ही निवडणूक निश्चितच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


लोकसंख्या वाढल्याने नगरसेवकही वाढणार !

महापालिकेतील सध्या 20 प्रभाग असून एकूण 78 नगरसेवक आहेत. 2021 मधील जनगणना रखडल्यामुळे अद्ययावत आकडे उपलब्ध नसले तरी, लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन 2022 मध्ये सरकारने नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 3 लाख ते 6 लाख लोकसंख्येच्या महापालिकांमध्ये कमाल 85 नगरसेवक असू शकतात. सांगली महापालिकेची 2011 मधील लोकसंख्या 5,02,793 इतकी असल्याने, सध्याच्या गणनेनुसार 85 नगरसेवकांची तरतूद शक्य आहे. मात्र अंतिम निर्णय आगामी अधिसूचनेनंतर स्पष्ट होणार आहे.

राजकीय रंगत वाढणार !

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार असून, निवडणुकीचा रंगतदार आणि चुरशीचा सामना निश्चितच गाजणार आहे.