yuva MAharashtra अलमट्टी धरणातून पाण्याचा नियोजित विसर्ग; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

अलमट्टी धरणातून पाण्याचा नियोजित विसर्ग; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

फोटो सौजन्य : pixahive photo

| सांगली समाचार वृत्त |
बेळगाव - दि. ३१ मे २०२५

अलमट्टी परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेता, बुधवारी (ता. २९) सायंकाळपासून धरणातून १० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामानात आणखी बदल झाल्यास हा विसर्ग २० हजार क्युसेकपर्यंत वाढवण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाने दिली.

गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या अलमट्टी धरणात ४५.९५७ टीएमसी इतका पाणीसाठा असून, दररोज सुमारे ६० हजार ३७९ क्युसेक पाणी धरणात येत आहे.

कर्नाटकातील कल्लोळ बंधारा व घटप्रभा नदीचा पाण्याचा प्रवाह अलमट्टीकडे वळलेला आहे. परिणामी, पावसामुळे अचानक मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे धरण प्रशासनाने पूर्वतयारीचा भाग म्हणून नियोजित प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी दोन्ही राज्यांतील विभागीय संपर्क सुरू असून, धरण क्षेत्रातील गावांना खबरदारीचा इशारा दिला गेला आहे. पावसाचा जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.


दरम्यान, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेवरही महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून, राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास थेट कृती करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.