| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २९ मे २०२५
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने आज दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्यामुळं देशभरातील शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आगामी खरीप हंगाम 2025-26 साठी केंद्र सरकारने विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएसपीत वाढ – शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ
धान, मका, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन अशा महत्त्वाच्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती वाढवण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या नव्या दरांमुळे अंदाजे 2.07 लाख कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारने उचलण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रत्येक पिकाच्या उत्पादन खर्चाच्या किमान 50% अधिक दर देण्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या दशकात यामध्ये मोठी वाढ झाली असून, हा निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कर्ज सवलत योजना –
अल्पकालीन कर्जावर व्याजात सूट
दुसऱ्या निर्णयाअंतर्गत, 15,642 कोटी रुपयांच्या खर्चासह शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जावर व्याज सवलत देण्यात येणार आहे. या योजनेनुसार, शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 4% व्याजदराने मिळू शकणार आहे. याशिवाय, कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% व्याज सवलतीचा लाभ मिळेल. यामुळे बँकांना सरकारकडून 1.5% व्याजाची भरपाईही दिली जाईल.
नवीन निर्णयांचा उद्देश
शेतकऱ्यांना स्थैर्य, आर्थिक पाठबळ व शेती व्यवसाय अधिक फायदेशीर बनवणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दोन्ही निर्णयांमुळे शेतकरी वर्गाला थेट लाभ होईल आणि शेतीविकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे.