yuva MAharashtra मान्सूनचा वेग थंडावणार; महाराष्ट्रासाठी महत्त्वाची माहिती

मान्सूनचा वेग थंडावणार; महाराष्ट्रासाठी महत्त्वाची माहिती


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ मे २०२५

यंदा मान्सूनने नेहमीच्या वेळेच्या आधीच महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. सामान्यतः ७ जूनच्या सुमारास राज्यात मान्सून पोहोचतो, पण यंदा तो तब्बल १२ दिवस आधी म्हणजे २५ मे रोजीच महाराष्ट्रात दाखल झाला. सुरुवातीपासूनच अनेक भागांत दमदार पावसाला सुरुवात झाली असून केरळमध्येही मान्सून लवकर दाखल झाला होता.

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. अशातच आता मान्सूनच्या गतीबाबत एक महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे.

विदर्भात मान्सूनचं आगमन, पण थोडा ब्रेक!

गडचिरोली जिल्ह्यात मान्सून पोहोचला असून आज आणि उद्या पूर्व विदर्भात दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र ३० मेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण विदर्भ व्यापायला मान्सूनला १५ जूनपर्यंत वेळ लागू शकतो, अशी माहिती नागपूर वेधशाळेतील वरिष्ठ हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.


शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा

हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. १०० मिमी पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी टाळावी, असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. लवकरच पावसाचा वेग थंडावणार असल्याने योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहणं फायद्याचं ठरेल.

यंदाचा पावसाचा अंदाज कसा आहे?

या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अंदाजे १०८ टक्के पावसाचं प्रमाण राहण्याची अपेक्षा आहे. विशेषतः दक्षिण आणि मध्य भारतात पावसाचे प्रमाण अधिक असू शकते.

मुंबईत पुन्हा दमदार सरी

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, सकाळी थोडा खंड पडल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नागरिकांची धावपळ सुरू असून, कल्याण-डोंबिवली भागातही पावसाचा प्रभाव दिसून आला आहे.