yuva MAharashtra रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत - आ. अरुण अण्णा लाड

रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत - आ. अरुण अण्णा लाड

फोटो सौजन्य  - आ. लाड फेसबुक पेजवरुन

| सांगली समाचार वृत्त |
कुंडल - दि. १३ जानेवारी २०२५

वाढत्या उत्पादनाच्या हव्यासातून होत असलेल्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची गरज आमदार अरुण अण्णा लाड यांनी व्यक्त केली आहे. क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुसूचित जाती वर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आ. लाड बोलत होते.

प्रशिक्षण भारतीय ऊस संशोधन संस्था लखनऊच्या जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांच्यावतीने आयोजित, प्रशिक्षण कार्यशाळेवेळी बॅटरीवर चालणारे फवारणी पंप व अनुषंगिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. योगेश थोरात, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. अरुण अण्णा लाड म्हणाले की, अधिक उत्पादनाच्या हव्याचा पोटी रासायनिक खते व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर वाढल्यामुळे, शेतीतील उत्पादन वाढले असले, तरी निविष्ठामुळे निसर्ग साखळी विस्कळीत झाली आहे. नैसर्गिक कीड नियंत्रण कमी झाले आहे. जर शेतीचा पोत सुधारायचा असेल तर जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना अमलात आणण्याची गरज आ. लाड यांनी बोलताना प्रतिपादन केली.


यावेळी डॉ. थोरात यांनी ऊस पिकावर येणाऱ्या किडी व त्याच्या नियंत्रणासाठी संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेले जैविक नियंत्रणाचे उपाय याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले तर शेवटी संचालक संग्राम जाधव यांनी आभार मानले.