| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २६ डिसेंबर २०२४
बांगला देशमध्ये हिंदू नागरिकांवर अत्याचार होत आहेत. मात्र अनेक बांगलादेशी नागरिक राज्यात अवैधपणे राहत असल्याचं स्पष्ट झालं. कल्याण आणि परिसरातून बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. राज्यातील इतर भागातही अवैधपणे बांगलादेशी नागरिक राहत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "राज्यात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यात येईल. याबाबत बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असं त्यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यात घडलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला पर्यटनस्थळ करुन बदनाम करू नका. बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांवरही हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरपंच हत्या प्रकरणात कोणी बीडला बदनाम करु नये बीड इथल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. बीड आणि परभणी इथल्या घटना गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र विरोधकांनी बीडला पर्यटनस्थळ करून बदनाम करू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.