Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधान मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ; पुढच्या 5 नव्हे, 10 वर्षांची दिली कमिटमेंट !



सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ७ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA च्या नेतेपदी निवड झाल्याबरोबर मोदींनी NDA संकल्पनेचा नवा अर्थ सांगितला "न्यू इंडिया", "डेव्हलप्ड इंडिया" आणि "अस्पिरेशनल इंडिया" हा NDA चा नवा अर्थ आहे असे मोदी म्हणाले. NDA म्हणजेच गुड गव्हर्नन्स अर्थात सुशासन याकडेही नरेंद्र मोदींनी लक्ष वेधले. पुढची 5 वर्षे मोठ्या निर्णयांची आहेत, हा फक्त निवडणुकीचा वायदा नव्हता तर ही कमिटमेंट होती आणि ती पूर्ण करू, अशी ग्वाही मोदींनी दिली.

NDA च्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला. केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान, पवन कल्याण, जतीन राम मांझी, अनुप्रिया पटेल या नेत्यांनी मोदींच्या नेतृत्वाच्या प्रस्तावाला अनुवादन दिले.

संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.

नरेंद्र मोदी म्हणाले :

'एनडीए आज देशभरात 22 राज्यात लोकांनी सरकार बनवून सेवा करण्याची संधी दिली. सात राज्यांमध्ये एनडीए नागरिकांची सेवा करत आहेत. आपण सर्व-धर्म समभाव मानत असून सविधानाला समर्पित आहे. आज आपल्याला त्या राज्यांतही एनडीएच्या रुपात सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या इतिहासात तर, युतीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स कधीच इतके यशस्वी झाले नसेल इतकं एनडीए झालं आहे, 'असं मोदी यांनी म्हटलं आहे. पुढच्या 10 वर्षात विकासाचा नवा आराखडा रचणार एनडीए सरकार देशाला प्रगतीपथावर नेणार. सुशासन म्हणजे एनडीए सरकार!!

- सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. पण देश चालवण्यासाठी सर्वमत खूप गरजेचे आहे. आज मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की आज तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली आहे. तर आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही सर्वमताचा आदर ठेवून देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही.

'एनडीएच्या अस्तित्वाला 30 वर्षे झाली आहेत. देशात यापूर्वी कधीही निवडणूकपूर्व आघाडीला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. एनडीए आघाडीची ही चौथी टर्म आहे. ही भारताची सर्वात यशस्वी युती आहे. ही मूल्ये जनतेच्या सेवेसाठी आम्हाला मिळाली आहेत. एनडीएला अटलबिहारी वाजपेयींशिवाय बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंग बादल यांसारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आज एनडीएचा वटवृक्ष झाला आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांच्या स्वप्नांवर खरे उतरू.

- 'एनडीए सरकार येत्या 10 वर्षात विकासाचा नवा आराखडा तयार करेल, नागरिकांचे जीवनमान सुधारू. हे माझे स्वतःचे मोठे स्वप्न आहे. जेव्हा मी लोकशाहीच्या समृद्धीचा विचार करतो तेव्हा मला वाटते की सामान्य माणसाच्या, विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही अधिक मजबूत होईल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण हे अगदी सहज करू शकतो. आम्हालाही बदल हवा आहे.

मोदींचा विरोधकांना टोला

काँग्रेसला 100 चा आकडा पार करता आला नाही. ही सलग तिसरी अशी वेळ आहे. त्यात विरोधकांनी निवडणुकीच्या काळात चक्क निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात नेलं. देशात आणि परदेशात सुद्धा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. भारताच्या लोकशाही टीका केली. INDIA आघाडीत मागच्या शतकातले लोक आहेत असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.