Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेतील विजयानंतर मोदींच्या नावावर पाच नवे विक्रम !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ४ जून २०२४
एक्झिट पोलमधून भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा केला जात आहे. असे झाल्यास सलग तीन टर्म पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंनंतरचे पहिले पंतप्रधान असतील. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकताच मोदींच्या नावावर अनेक रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. अनेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (NDA) ने 400+ जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळे हा देखील वेगळा रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलचे आकडे अचूक असल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला अपेक्षित विजय मिळेल. असे झाल्यास अनेक ऐतिहासिक विक्रम देखील होतील, त्यावर एक नजर टाकूया.


लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात पार पडली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले तर शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून येण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने या निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एनडीएला सुमारे 28 विरोधी पक्षांचे एकत्रीकरण असलेल्या इंडिया ब्लॉकने तगडे आव्हान दिले आहे. एनडीएच्या विरोधात संयुक्त आघाडी सादर करण्याच्या उद्देशाने जून 2023 मध्ये पहिली बैठक घेऊन इंडिया इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आता उद्या ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.


नेहरुंनंतर 3 टर्म निवडून येणारे दुसरे पंतप्रधान

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 1947 ते 1964 पर्यंत 16 वर्षे 286 दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. 1951-52, मध्ये काँग्रेस पक्षाने पहिल्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर 1957 आणि 1962 नेहरू सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आले. परंतु त्यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये मे 1964 मध्ये त्यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील NDA ने या निवडणुकीत विजय मिळवल्यास ते भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

लोकसभेच्या 400 जागांवर विजयाचा विक्रम

इंडिया टुडे-माय ॲक्सिस इंडिया, इंडिया टीव्ही-सीएनएक्स आणि न्यूज 24-टूडेज चाणक्य या तीन प्रमुख एजन्सीजच्या एक्झिट पोलनुसार एनडीए 400 हून अधिक जागांसह विजय होईल असा दावा करण्यात आला आहे. उद्या 4 जूनच्या निकालात ही संख्या कायम राहिल्यास हा आणखी एक ऐतिहासिक विक्रम ठरेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सार्वत्रिक निवडणुकीत एका पक्षाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्याचं फक्त एकदाच घडलं होतं. वर्ष 1984 मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 1984 मध्ये लोकसभेच्या 514 पैकी 404 जागा जिंकल्या होत्या. राजीव गांधी यांच्या आई आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 ची लोकसभा निवडणूक झाली होती.

दक्षिणेत भाजपचं खातं उघडणार

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए दक्षिणेत आपली उपस्थिती वाढवून आणखी एक विक्रम रचण्याची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचे खाते उघडण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तवली आहे. केरळमधील 20 जागांपैकी या हिंदुत्त्ववादी पक्षाला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये भाजपला आतापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएने 19 जागा जिंकल्या, तर सीपीएमने एक जागा जिंकली होती. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्येही 2024 च्या निवडणुकीत 39 पैकी 1 ते 3 जागा जिंकून भाजप एंट्री करण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमधील 39 पैकी 38 लोकसभा मतदारसंघांवर DMK नेतृत्वाखालील आघाडीने विजय मिळवला होता, या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

सत्ताविरोधी लाट नसल्याचे सिद्ध होईल

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तीन सलग कार्यकाळामुळे सत्तेविरोधात लोकांच्या मानात भीती असल्याचा समज स्पष्टपणे दूर होईल. एक्झिट पोल खरे ठरले तर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ॲन्टी-इन्कम्बन्सीचे रूपांतर प्रो-इन्कम्बन्सीमध्ये यशस्वीरित्या केल्याचे सिद्ध होईल, तसेच वाढती महागाई, नोकऱ्यांची चिंता, नोटाबंदी आणि अग्निवीर योजना यांसारख्या विषयांवरून मोदींना जनतेचा पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. या सर्व मुद्यांवरून विरोधकांनी अनेकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला घेरले आहे.

मोदी ब्रँड अधिक शक्तिशाली होईल

लोकसभा निवडणुकीतील आणखी एक ऐतिहासिक पैलू म्हणजे 10 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर मोदींनी जो ब्रँड बनवला आहे, त्यावर गेल्या वर्षी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. परंतु 2023 च्या अखेरीस झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुनरागमन केले. त्यानंतर काही महिन्यांनंतर आता लोकसभा निवडणुकी लोकांनी पंतप्रधान निवडताना भाजपला मतदान केल्यास मोदी ब्रँड पूर्वीइतकाच शक्तिशाली असल्याचे सिद्ध होईल.

या निवडणुकीत आणखी कोणते रेकॉर्ड झाले

  • लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पाहिल्या गेलेल्या काही इतर नोंदींमध्ये 1 जून रोजी संपलेल्या सात टप्प्यांत 642 दशलक्ष किंवा 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले. मे आणि जूनमधील कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही निवडणुकांचे टप्पे असूनही मतदारांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
  • सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विक्रमी 312 दशलक्ष महिलांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेतला असे आयोगाने सांगितले.
  • 2024 चे मतदानाची संख्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केलेल्या 612 दशलक्ष मतदारांपेक्षा जास्त असली तरी पाच वर्षांपूर्वीच्या 67.4 टक्के मतदानापेक्षा ते सुमारे एक टक्के कमी आहे. 2024 च्या निवडणुकीत भारतात 968 दशलक्ष नोंदणीकृत मतदार होते.
  • 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या पाच जागांवर विक्रमी 58. 46 टक्के मतदान झाले असे भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. गेल्या 35 वर्षांतील पूर्वीच्या राज्यातील हा सर्वाधिक मतदान सहभाग असल्याचे मतदान समितीने म्हटले आहे. 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुका या पूर्वीच्या राज्यात झालेल्या पहिल्या मोठ्या निवडणुका होत्या.
  • निवडणूक आयोगाने या निवडणुकीत जवळपास ₹ 10,000 कोटींची विक्रमी जप्तीही केली आहे. हे 2019 मध्ये जप्त केलेल्या मूल्याच्या जवळपास 3 पट आहे.