Sangli Samachar

The Janshakti News

'खासदारकी'ला वारं बदलताच सांगलीकरांचं पुढचं 'टार्गेट' ठरलं ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जून २०२४
महाराष्ट्र विधान परिषदेच्या बारा जागांसाठी जून अखेरीस निवडणूक होणार आहे. त्यात सांगली जिल्ह्यातून काही प्रमुख चेहऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या कोट्यातून जयश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत. भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आणि नीता केळकर हे निष्ठावंतही यावेळी रांगेत उभे असणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने अल्पसंख्यांक बेरजेचा विचार केल्यास इद्रिस नायकवडी यांना संधी मिळू शकते.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. या फेरबदलाचे वारे जूनअखेरीस होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत वाहू शकतात. गेल्या काळात विविध पक्षांमध्ये झालेल्या फेरबदलानंतरची ही महत्वाची निवडणूक असेल. त्यामुळे त्याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. त्यात सांगलीच्या Sangli वाट्याला काय, याकडेही राजकीय क्षेत्राचे आता लक्ष लागले आहे.


लोकसभा निवडणुकीत बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने विशाल पाटील यांना दोन पर्याय दिले होते. त्यांना राज्यसभा सदस्य किंवा जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत आमदार करण्याचा शब्द दिला होता. तोच शब्द शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनाही देण्यात आला होता. तोही काँग्रेसच्या कोट्यातून. प्रदेश काँग्रेस एक जागा सांगली काँग्रेससाठी खर्ची टाकण्याच्या तयारीत होती.

आता तीच जागा जयश्री पाटील यांना देऊन काँग्रेस मजबूत करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. आमदार विश्‍वजीत कदम त्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. जयश्री पाटील यांची वसंतदादा बँक प्रकरणात सध्या कोंडी झाली आहे. त्यातून सुटकेसाठी त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशीही चर्चा होती. अजितदादा त्यांच्या कोट्यातून जयश्रीताईंना विधान परिषदेवर संधी देतील का, हाही चर्चेतील विषय आहे.

भाजपमध्ये अनेक वर्षांपासून निष्ठावंत असलेले आणि पक्ष उभा करण्यात, वाढवण्यास योगदान देणाऱ्या मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आणि नीता केळकर यांना अनेक वर्षांपासून विधान परिषदेवरील संधीची अपेक्षा आहे. प्रत्येक निवडणुकीत या तीन चेहऱ्यांची चर्चा होत असते, मात्र प्रत्येक वेळी हुलकावणी मिळते. निष्ठावंतांचा सन्मान या मुद्यावर त्यातून नाराजीही उमटते. यावेळी भाजप त्यांचा ममत्वाने विचार करेल का, याकडे लक्ष असणार आहे.

दुसरीकडे अजित पवार गटात प्रवेश केलेल्या माजी महापौर इद्रिय नायकवडी यांच्यासाठीही फिल्डिंग लावली जाऊ शकते. भाजपसोबत गेल्या अजितदादा गटापासून अल्पसंख्यांक बाजूला जाण्याची भिती आहे. त्यामुळे नायकवडींसारख्या नेत्याला संधी देऊन गोंजरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जिल्ह्यात अजित पवार गट वाढीसाठीही त्याबाबत विचार होऊ शकतो.

२४ चा कोटा शक्य

विधान परिषदेच्या MLC Election बारा जागांवर निवडणूक होत असताना 24 आमदारांचा कोटा निश्‍चित होऊ शकतो. काँग्रेसला दोन आमदार निवडून आणणे शक्य होईल. प्राप्त परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण घडले नाही तर बिनविरोधची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेचा निकाल आणि त्याचे परिणाम यावर खरा खेळ अवलंबून असेल.