Sangli Samachar

The Janshakti News

'ती' एक खंत मनात कायम, पण तरीही... - चंद्रहार पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जून २०२४
अवघ्या महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. 'सांगली'विषयी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना, जे पक्ष असतील. त्यातील वरिष्ठांना माहित आहेत. अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीसोबत आल्याने आता सर्वकाही विसरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करू, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

चंद्रहार पाटील काय म्हणाले ?

महाराष्ट्रात ज्या 30 जागा निवडून आले. त्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा राहिला. मात्र तीच गोष्ट सांगलीत बघायला मिळाली नाही, ही खंत एक उमेदवार म्हणून माझ्या मनात नक्कीच राहिल. बोलून दाखवण्यापेक्षा सर्व गोष्टी त्यांना माहित आहे की, आमचा पराभव कसा झाला ? ते बोलण्यापेक्षा लोकांना माहिती आहे. पण ज्या मविआसाठी शिवसेना पक्षाने जे कष्ट केलं. त्याच शिवसेनेच्या उमेदवारासोबत ज्या काही गोष्टी सांगलीमध्ये घडल्या. त्या आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत, असं चंद्रहार पाटील म्हणालेत.


सांगलीचा निकाल काय ?

सांगली लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याची मागच्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत होती. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना 4 लाख 68 हजार 593 मतं मिळाली. 1 लाख 1 हजार 94 मतांनी विशाल पाटील हे विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ 55 हजार मतं मिळाली. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उभं राहून निवडणूक जिंकलेले विशाल पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.

सांगलीत नेमकं काय झालं ?

सांगलीतून लोकसभा निवडणूक लढण्याची विशाल पाटील यांनी तयारी केली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विशाल पाटलांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. वारंवार भेटी घेऊनही कोणताही बदल न झाल्याने विशाल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघात उभे राहिले आणि निवडूनही आले.