Sangli Samachar

The Janshakti News

कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये राडा; 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा मृत्यू,



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २ जून २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीत 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे मृत कैद्याचे नाव आहे.

ड्रेनेजच्या झाकणाने हत्या

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा आंघोळीसाठी गेला असताना झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाला. 2 जून रोजी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळीला गेला होता. यावेळी कारागृहातील इतर कैद्यांसोबत त्याचा वाद झाला.


हा वाद इतका वाढला की, कैद्यांमध्ये हाणामारी सुरू जाली. यावेळी कैद्यांच्या एका ग्रुपने मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याच्यावर हल्ला चढवला. त्याला ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण केली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयीन बंदी असलेले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकनाने मुन्नाला मारहाण केली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने नेहमीच वादग्रस्त असलेले कळंबा मध्यवर्ती कारागृह चांगलेच हादरले आहे.

यापूर्वीही कळंबा कारागृहात मोबाईल ड्रग

कळंबा कारागृहातील कैद्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याच्या घटना समोर येत असतात. यापूर्वी सुद्धा कैद्यांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या वाद आणि हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. पण इतके वाद आणि हाणामारी होईपर्यंत कारागृहातील पोलिसांना कळले कसे नाही? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.

कळंबा कारागृहात यापूर्वी काही कैद्यांकडे मोबाईल फोन, ड्रग्ज आढळून आले होते. इतकेच नाही तर गांजा सुद्धा आढळून आला होता. तसेच कैद्यांच्या गटांत हाणामारी झाल्याच्या घटा सुद्धा सुरूच असल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.