Sangli Samachar

The Janshakti News

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १९ मे २०२४
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा करून टाकली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा भाग होईल, असं ते म्हणाले आहेत. 'डेक्कन हेराल्ड'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे विसर्जन करावे लागेल. सध्या निवडणुकीची लढाई राम भक्त आणि राम द्रोही यांच्यामध्ये सुरु आहे, असं योगी म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर योगींचे हे वक्तव्य आलं आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, पुढच्या सहा महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होऊन जाईल.' प्रचारासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. यावेळी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


भारताच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांना काँग्रेस विसर्जित करायची होती. पण, ते शक्य झालं नाही. पण, आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे विसर्जन करण्याची योग्य वेळ आली आहे. ही भूमी शूर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मोदी त्याचं स्वप्न पुढे घेऊन जात आहेत, असं आदित्यनाथ म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिर देशातील १४० कोटी नागरिकांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करतं. इंडिया आघाडी सत्तेत येऊन राम मंदिर उद्धवस्त करेल. त्यामुळे प्रभू राम त्यांना सत्तेत येऊ देणार नाही. पाकिस्तानचे कौतुक करणाऱ्यांना देशात काहीही स्थान नाही. त्यांनी पाकिस्तानात जावं. काँग्रेसमध्ये औरगजेबाचा आत्मा बसतो, असं योगी म्हणाले.

दरम्यान, देशात एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. चार टप्प्यातील मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल. मतमोजणी ३ जून रोजी होईल. या दिवशी जनतेनं कोणाच्या बाजूनं कौल दिलाय हे स्पष्ट होईल.