Sangli Samachar

The Janshakti News

उद्धव ठाकरें यांच्या रोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार !,



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
भाजपचे अध्यक्षचे आशिष शेलार  यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मतदान प्रक्रिया सुरु असतानाच ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असा आरोप भारतीय जनता पक्ष आणि आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष ,आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं होतं. 


उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरुन भाजपची तक्रार 

उद्धव ठाकरेंनी आज (दि.20) दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. दरम्यान, ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले, तेच मुद्दे निवडणूक आयोगापुढे शेलार यांनी मांडले आहेत. ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असं म्हणत आशिष शेलार यांनी कारवाईची मागणी केली आहे. 

संथ मतदानावरुन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली 

ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय, मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले जात आहे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं असं आवाहनही ठाकरेंनी केलं. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.