Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवार यांच्यावरील गुन्हा मागे का घेतला, अमित शाह यांनी दिला खुलासा !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २८ मे २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही राजकारणाबाबत वेगवेगळ्या प्रकारचं मतं निर्माण झाली आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनसामान्य कुणाला मतदान करतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्याआधी अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली आहे.

“आम्हाला 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेला बहुमत मिळालं. पण उद्धव ठाकरेंना शरद पवार यांनी त्यांच्यासोबत सहभागी करुन घेतलं. आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती”, असं अमित शाह म्हणाले आहेत. “भ्रष्टाचार करणाऱ्या नेते मंडळींवर कारवाई होणारच”, असंदेखील अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये पंतप्रधान होतील. तसेच 2029 मध्येही मोदी नेतृत्व करतील”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.


अमित शाह नेमकं काय-काय म्हणाले ?

“विधानसभेला आम्हाला बहुमत मिळालं. पण शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना त्यांच्यासोबत सामील करुन घेतलं. ठाकरे आमचे मित्र होते. आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा कुणी त्यांना नैतिक आणि नीतीमत्तेचे प्रश्न विचारले नाहीत”, असं अमित शाह म्हणाले.

गुन्हा मागे का घेतला ?

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल, पण नंतर मागे का घेतला? असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावर शाह यांनी सविस्तर भूमिका मांडली. “एक गुन्हा दाखल झाला की 4 ते 5 गुन्हे दाखल होतात. एक भ्रष्टाचाराचा, एक सत्तेचा गैरवापर केल्याचा, एक प्रशासकीय त्रुटींवर आणि एक पुराव्याशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल होतो. मुख्य प्रकरणात चारही प्रकरणं गुंफली जातात. मुख्य आरोपपत्राबद्दल कुणी बोलत नाही. पण चार प्रकरणं बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित करतात. भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवरील प्रत्येक प्रकरणात योग्य प्रक्रियेचे पालन केले जाणार”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.