Sangli Samachar

The Janshakti News

'कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं...'; भरसभेत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार



| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. १० मे २०२४
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक आमदार खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले. शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो म्हणाऱ्या नरेंद्र मोदींनी आणि भाजपने त्यांचा पक्ष फोडला. आमचे सगळे लोक घेऊन गेले. त्याचं कोणाला वाईट वाटत असेल मला मात्र समाधान वाटतं, नरेंद्र मोदींनी आमचा पक्ष स्वच्छ केला, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

ज्यांनी काँग्रेस संपवायचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही भाजपमध्ये घेतलं. पवार सहाब का डर था... इसलीये पार्टी चुराके के ले गये, बजरंग बाप्पा का डर था इसलीये मोदी को लाना पडा तुमको..मात्र महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या 10 च्या 10 तुताऱ्या वाजणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


देशाचे पंतप्रधान इथं आले विकास काय करणार यावर बोललं पाहिजे होतं, मात्र ते वेगळंचं बोलले. मोदींनी सांगितलं.अदानी अंबानी यांचे नाव राहुल गांधींनी घेणे बंद केले. आज मूठभर लोकांना श्रीमंत करण्याचा प्रयन्त केला जात आहे. आज महागाई आहे, जर पुन्हा कमळावर बटन मारलं तर 2000 रुपयांवर गॅस जाईल. यांचे सरकार राज्यात दीड वर्ष झालं आहे, यांनी पक्ष फोडण्यापलीकडे काही केलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात मतदान झालं, त्याठिकाणी एकही महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाही.

आज जे विरोधक आहेत ना ? त्या सर्वांनी 5 वर्षांपूर्वी बजरंग बाप्पा की जय असं म्हटलंय. गेल्या 10 वर्षात हेच खासदार होते, हेच पालकमंत्री होते मग विकास का झाला नाही. मी शब्द देतो बाप्पा खासदार झाले तर बीड जिल्ह्यातील विकास करून दुष्काळ मुक्त करू. गॅस 500 रुपयांच्यावर जाणार नाही याची काळजी घेऊ. जातिजातीत आरक्षणाच्या संदर्भात गैरसमज होतात, मात्र देशात आमचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू, ज्यांची जेवढी संख्या तेवढं आरक्षण देऊ. कायद्याने 50 टक्के ही आरक्षणाची अट काढू, असं आश्वासन त्यांनी दिलं.