Sangli Samachar

The Janshakti News

'ईव्हीएममध्ये घोटाळा केला तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेन', माजी मंत्र्यांची उघड धमकी !



| सांगली समाचार वृत्त |
जळगाव - दि. २४ मे २०२४
“राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला, तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेन. निवडणूक आयुक्तांना गळा घोटणार”, अशी थेट धमकीच माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र थेट त्यांच्या दिल्ली कार्यालयाला सावजी यांनी पाठवले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री सुबोध सावजी हे आपल्या अनोखे आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.


नेमकी काय धमकी दिली ?

“लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षांकडेच आहे. या आधारे एकूण ४८ जागापैंकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारचं, परंतु जनतेच्या आणि माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही”, असं सुबोध सावजी म्हणाले आहेत.

“माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल, तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. आणि लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेन”, असंही पत्रात नमूद केलंय.