Sangli Samachar

The Janshakti News

तहानलेल्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री आमिर खानच्या मदतीने शिवार पाणीदार करणार !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
मराठवाड्यात जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. नाम फाऊंडेशन आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण आहे. अशा अनेक एनजीओ आहेत. अमिर खानचे पाणी फाऊंडेशनही आहे. या सर्व एनजीओंची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार आहोत. स्टोरेज कॅपेसिटी वाढली तर पाणीसाठा वाढेल. पाण्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठी सूचना दिल्या आहेत. पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नये, यासाठी सूचना दिल्या आहेत", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत दुष्काळाबाबत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाड्यात 1837 टँकर सुरु आहेत. 1250 गावांमध्ये हे टँकर जात आहेत. टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत , तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या आहेत. त्यांना काय गरजेचं आहे, याची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानुसार पुरवठा केला जाणार आहे. शिवाय टँकर आणि चाऱ्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे.


चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी सूचना दिलेल्या आहेत

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पाणी स्वच्छ असले पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. आपण पूर्वी डिपीडीसीमधून चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या पूरेल एवढा चारा आहे. चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी सूचना देखील दिलेल्या आहेत. पाण्याच्या जुन्या बीलाचे नंतर पाहू. थकीत बिलामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडणार नाही. भूजल पातळीत घट आलीये. त्यासाठी संस्थांना सूचना दिल्या आहेत.

बोगस बियाणे आणि खत आढळले तर जेलमध्ये टाकले जाणार

बोगस बियाणे आणि खत आढळले तर जेलमध्ये टाकले जाणार आहे. मुख्य सप्लायरचा सर्व्हे करून तपासणी करणार आणि बोगस बियाणांची अडचण येणार नाही, याची काळजी घेऊ. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सूचना दिल्या आहेत. अवकाळीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.