Sangli Samachar

The Janshakti News

सूर्योदय आणि सूर्यास्त 2 तास उशिरा होणारं महाराष्ट्रातील गाव !



| सांगली समाचार वृत्त |
अहिल्यानगर - दि. २७ मे २०२४
महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाचे समृद्ध खाण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिले असून महाराष्ट्र हे राज्य उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून तर पूर्वेपर्यंत निसर्गाने बहरलेले आहे. तसेच या महाराष्ट्रामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत व प्रत्येक ठिकाणांची त्यांची अशी वैशिष्ट्ये देखील आहेत. पर्यटनाच्या बाबतीत पाहिले तर महाराष्ट्र नैसर्गिक दृष्टीने समृद्ध असून निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण असलेले ठिकाणे आहेत. या सगळ्या निसर्गाच्या रेलचेलमध्ये महाराष्ट्रात अशी छोटी छोटी गावे आहेत की ते निसर्गाच्या कुशीत वसले असून जणू काही पृथ्वीवरचे स्वर्गच आहेत असे निसर्ग चित्र आपल्याला अनेक गावांमध्ये पाहायला मिळते.

अशाच प्रकारचे एक वैशिष्ट्यपूर्ण गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहेत याबाबत दुमत नाही. परंतु या ठिकाणचे एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सूर्योदय दोन ते अडीच तास उशिराने होतो व सूर्यास्त देखील दोन ते अडीच तास लवकर होतो. म्हणजेच या ठिकाणचा एकूण दिवसाच्या कालावधी पाहिला तर तो फक्त सहा ते सात तासांचा आहे. या अनोख्या अशा गावाचे नाव फोफसंडी असून ते अहमदनगर जिल्ह्यात वसले आहे.

फोफसंडी हे नाव या गावाला कसे पडले ?

अहिल्यानगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या अत्युच्च डोंगर रांगांमध्ये हे सुंदर असे टुमदार गाव वसलेले आहे. ज्या कालावधीमध्ये भारतावर इंग्रजांचे सत्ता होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी होता व त्याला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा तो आराम करण्यासाठी या गावामध्ये येत असे. तेव्हापासून या गावाला फॉफसंडे हे नाव पडले व त्यानंतर या शब्दाचा अपभ्रंश झाला व त्यातून आताचे फोफसंडी हे नाव या गावाला मिळाले.


हे एक छोटेसे गाव असून या ठिकाणची लोकसंख्या हजार ते बाराशे इतकी आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने बारा आडनावाचे लोक राहतात. प्रामुख्याने या गावांमध्ये कोंडार,भद्रिके, पिचड, उंबरे तसेच गोरे इत्यादी आडनावांचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. येथील लोकांचा व्यवसाय हा शेती असून पावसाळ्याच्या कालावधीतील चार महिने शेतीतून पीक घेतले जाते व उरलेला कालावधी मध्ये येथील लोक कामधंदा निमित्त पुणे किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जातात. या गावातील शेतकरी भात तसेच वरई व नागलीसारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ह्या गावात मात्र शेतीला पाण्याची खूप वाणवा असून पावसाच्या कालावधीतच फक्त या ठिकाणी शेती होते व इतर कालावधीत पाणी नसल्याने शेती करता येत नाही. या गावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाची जी काही हद्दी आहे या हद्दीतूनच मांडवी नदीचा उगम झालेला असून या ठिकाणी ज्या काही गुहा आहेत यामध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती असे म्हटले जाते व यावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले. पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतो व मोठमोठे धबधबे देखील या ठिकाणी प्रवाहित होतात. या ठिकाणी असलेल्या धबधब्यांमध्ये फोफसंडीचा धबधबा खूपच प्रसिद्ध आहे.