Sangli Samachar

The Janshakti News

राजारामबापू वारले तेव्हापासून वैर संपलं - विशाल पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१६ एप्रिल २०२४
शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला, असे म्हणत विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातून  काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते.

सांगलीतील जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यामध्ये एकेकाळी राजकीय वैर होतं. त्यामुळे त्याचा फटका आता विशाल पाटलांना बसला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या विषयी बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला आहे. वसंतदादा आणि काँग्रेस बदल बोलताना विशाल पाटील भावूक झाले.


वडील वारल्यापासून उमेदवारीसाठी जे थांबलो ते आजपर्यंत थांबलोय : विशाल पाटील

काँग्रेस पक्षाचा हा लढा आहे. काँग्रेसमधले हे बंड आहेत. जिल्ह्यातून पदाधिकारी आलेत. प्रकाश आंबडेकर यांनी पाठिंबा दिला, आभार मानतो. जिल्ह्यातील बाळासाहेब उर्फ विश्वजित कदम यांचेही आभार मानतो. अजित घोरपडे, विलासराव जगताप यांचे आभार मानतो. वसंतदादाचे घर जेव्हा जेव्हा अडचणीत असते तेव्हा अंजनीपुत्र आमच्या मागे असतो. सुमनताई पाटील आणि रोहित आर आर पाटील याचाही मला पाठींबा असतो. प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता आज उपस्थित आहे. त्या पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्याना सूट दिली आहे. जयश्रीताई पाटील यांनी आज धाडसाने पुढे चालल्या. आज त्या माझ्या पुढे होते याचा मला अभिमान आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. 2005 साली वडील वारल्यानंतर मला उमेदवारी भेटली नाही, पण मी थांबलो. आजपर्यंत थांबलोय, मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले असे विशाल पाटील म्हणाले.

आता माघार नाही : विशाल पाटील

चंद्रहार पाटील यांना देखील विशाल पाटलांनी उत्तर दिले आहे. विशाल पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये. हे काँग्रेसचे बंड आहे, आमचे काँग्रेसवर प्रेम कायम रहाणार
चिन्ह नेले आमच्याकडून तर वेगळ्या चिन्हावर निवडून येऊ आता माघार घ्यायची नाही.