Sangli Samachar

The Janshakti News

शिंदेंचे 7 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ट्विस्ट वाढला





सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
मुंबई  - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लोकसभा निवडणुकीत त्याच खासदारांचा पत्ता कट झालाय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. शिंदे आणि अजित पवार गटही गोंधळलेले आहेत. भाजपचीही (BJP) दमछाक होत आहे. इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


विदर्भातील जनता काँग्रेसच्याच बाजूने 

ते पुढे म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड अनुकूल अशी परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही ठिकाणी जनता काँग्रेसच्या बाजूने कौल देईल. विद्यमान सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात राग आणि चीड आहे. हुकूमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. त्यामुळे लोकांना भीती वाटते की, स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम असू. जनतेने ठरवले आहे की, भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर काढायचं. गडचिरोली तर आम्ही जिंकूच, भाजपला दुसरा पर्याय मिळाला नाही. गडचिरोलीत आमचे किरसान उभे आहेत, ते निवडून येतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार

मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. धानोरकर भेटल्या नसत्या तरीही चंद्रपूरला गेलो असतो. 9 आणि 10 ला प्रचाराला जाणार आहे. मी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे. भंडारा-गोंदिया मध्ये उमेदवार नवखा असला तरी तो तगडा आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेची तयारी साकोलीला होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 

सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही

सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही. ती जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती. सगळ्या वादात फार ताणून घ्यायचे नाही. नेतृत्वाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे.