Sangli Samachar

The Janshakti News

'ईव्हीएम'वर प्रश्न येताच मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिले उत्तर; म्हणाले, "वफा तुमसे.."



सांगली समाचार  - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचं वेळापत्र जाहीर केलं. देशभरात १९ एप्रिलपासून सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ईव्हीएमबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

राजीव कुमार ईव्हीएमबाबत काय म्हणाले?

ईव्हीएमबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “या देशातील विविध न्यायालयांनी ४० वेळा ईव्हीएम विरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतली आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, यंत्र चोरी होतं, निकाल बदलू शकतो वैगरे वैगरे मुद्दे उपस्थित केले गेले. पण न्यायालयाने हे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. या यंत्राला व्हायरस लागू शकत नाही, अवैध मतदान होऊ शकत नाही. आता तर न्यायालयांनी ईव्हीएम विरोधातील याचिकांना दंड लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली न्यायालयाने नुकताच १० हजार रुपयांचा दंड लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने ५० हजारांचा दंड ठोठावला.”


राजीव कुमार पुढे म्हणाले की, ईव्हीएमवर प्रश्न येणार, हे मला माहीत होतंच. त्यामुळं मी त्यावर काही ओळी लिहिल्या आहेत. “अधुरी हसरतो का इल्जाम, हर बार हम पे लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती, खता ईव्हीएम की कहते हो”, अशी एका ईव्हीएम मशीनची खंत त्यांनी बोलून दाखविली.